कृषी महाराष्ट्र

फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण

फुलांची तोडणी करताना घ्यावयाची काळजी : वाचा संपूर्ण

 

फुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्या मध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात त्यामुळे फुलामध्ये विविध प्रक्रिया होत असतात. य़ा प्रक्रियांमुळे फुलांमधील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते. फुलांचा तापमान आणि श्वसन दर (Breathing Rate) वाढतो. सूक्ष्मजीवाची निर्मिती होते आणि त्या सूक्ष्मजीवामुळे फुलांचा जलद ऱ्हास होण्यास सुरवात होते. म्हणजेच ही फुले खराब होतात. त्यांचे आयुष्य लवकर संपते. त्यामुळे फुलांचे आयुष्य आणि दर्जा वाढवण्यासाठी योग्य काढणी पश्चात तंत्रज्ञानाची तसेच फुलांची योग्य वेळेस तोडणी करणे आवश्यक आहे.

फुलांची तोडणी करताना काय काळजी घ्यावी याविषय़ी पुष्प संशोधन संचालनालयातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती पाहुया.

फुलांच्या काढणी पश्चात गुणवत्ता आणि आयुष्यावर परिणाम करणारे काढणी पूर्वीचे घटक कोणते ?

१. अनुवांशिक ठेवणं – फुलांचे आयुष्य, आकार, रंग, गुणवत्ता या सर्व गोष्टी त्याच्या अनुवांशिक गोष्टीवर म्हणजेच फुलाच्या प्रजाती तसेच जाती वर अवलंबून असतात.

२. फुलांची लागवड ते काढणी पर्यंतची स्थिती – फुलांच्या संपूर्ण वाढीच्या कालखंडामध्ये वातावरणातील विविध घटक तापमान, सूर्यप्रकाशाची तीव्रता, हवेतील आर्द्रता इत्यादी चे प्रमाण किती होते यावरही फुलांची गुणवत्ता आणि आयुष्य अवलंबून असते.

फुलांना दिवस आणि रात्री वेगवेगळ्या प्रमाणात तापमानाची गरज असते. जसे की, गुलाबाला दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस आणि रात्री १५ ते १६ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. कार्नेशनला दिवसा २० अंश सेल्सिअस आणि रात्री १० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. म्हणजेच फुलामध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक १० अंश सेल्सिअस असावा लागतो.

अश्या प्रकारे दिवसा आणि रात्री तापमान फुलांना पुरवले तर त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंगामध्ये वाढ होते. फुलांच्या संपूर्ण वाढीच्या वेळेस कोणत्या प्रकारचे अन्न आणि पाणी फुलांना दिलेले आहे त्यावरही त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग अवलंबून असतो.

फुलांच्या तोडणीची अवस्था आणि वेळ कोणती असावी ?

फुलांच्या तोडणीचा काळ आणि वेळ फुलांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.

फुलांची कळी जास्त पक्व किंवा जास्त कोवळी नसावी. फुलाच्या कळीची वाढ पूर्ण झालेली असावी. कारण जास्त कोवळ्या कळ्या लवकर खुलत नाहीत आणि जास्त पक्व कळ्या लवकर खुलतात.

त्यामुळे फुलांची काढणी कोणत्या वेळेला करायची आहे ते फुले कोणत्या मार्केट ला पाठवणार आहेत त्यानुसार ठरवावे. फुले दूरच्या मार्केट ला पाठवायची असतील तर फुलांची काढणी कळी अवस्थेला करावी. जर फुले जवळच्या मार्केटला पाठवायची असतील तर फुलांची काढणी कळी जरा खुलायला लागली की करावी.

फुलांची काढणी शक्यतो सकाळी किंव्हा सायंकाळी करावी कारण यावेळेस वातावरणातील तापमान कमी असते. कारण जास्त तापमानामुळे फुलांचा श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो. वाढलेल्या श्वासोच्छ्वासामुळे फुले हवेमध्ये पाणी सोडून देतात व लवकर सुकतात तसेच त्यांची गुणवत्ताही कमी होते.

विविध फुलांच्या तोडणीची योग्य वेळ कशी ओळखावी ?

१) झेंडू – फुलाची कळी पूर्णपणे खुलल्यावर

२) शेवंती – स्टॅन्डर्ड शेवंती – जेव्हा बाहेरील पाकळी पूर्णपणे उघडी होईल तेव्हा स्प्रे शेवंती – फुल पूर्णपणे खुलल्यावर परंतु परागकण खाली पडायच्या आधी

३) गुलछडी किंवा निशिगंध – सिंगल – कळ्या पूर्णपणे विकसित पण न उघडलेल्या

डबल – जास्त कळ्या उघडलेल्या असतील तेव्हा

४) गुलाब – १-२ पाकळ्या उघडायला सुरवात झाल्यावर

source: agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top