कृषी महाराष्ट्र

शेतकरी नियोजन टोमॅटो पिकाविषयी संपूर्ण माहिती

शेतकरी नियोजन टोमॅटो पिकाविषयी संपूर्ण माहिती

शेतकरी नियोजन टोमॅटो

टोमॅटो लागवडीत रासायनिक खतांचा वापर कमी करून जैविक खतांच्या वापरावर अधिक भर दिला आहे.

शेतकरी : रोहिदास नानाजी जाधव

गाव : अंतापूर, ता. सटाणा, जि. नाशिक

एकूण क्षेत्र : ७० एकर

टोमॅटो लागवड : ३ एकर

नाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील रोहिदास नानाजी जाधव कुटुंबाची ७० एकर शेती आहे. मागील २० वर्षांपासून ते भाजीपाला उत्पादन (Vegetable Production) घेत असून, १५ वर्षांपासून टोमॅटो लागवड (Tomato Cultivation) करत आहे.

त्यानुसार प्रत्येक हंगामात वाण निवड, पीक व्यवस्थापन (Tomato Crop Management), कीड-रोग व्यवस्थापन (Pest-Disease Management) यासह बाजारपेठ अभ्यास व विपणन यावर लक्ष दिले जाते. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत टोमॅटो लागवड केली जाते.

टोमॅटो लागवडीत रासायनिक खतांचा (Fertilizers) वापर कमी करून जैविक खतांच्या वापरावर अधिक भर दिला आहे. याशिवाय ऊस १५ एकर, कांदा ४० एकर, कोथिंबीर २ एकर, कांदा बीजोत्पादन ३ एकर अशी विविध पिकांची लागवड केली जाते.

लागवड नियोजन :

  • खोल नांगरट करून त्यावर रोटाव्हेटर मारून मशागत केली. त्यानंतर ४ फुटांचे बेड तयार करून शेणखताची मात्रा दिली. या वेळी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकांचा वापर करण्यात आला.
  •  टोमॅटो लागवडीसाठी हंगामनिहाय अभ्यास करून वाण निवड केली जाते. वाणांची निवड करताना रोगप्रतिकारशक्ती, फळधारणा, उत्पादकता व टिकवणक्षमता या मुख्य बाबी विचारात घेतल्या जातात.
  • उन्हाळ्यात मालाचा रंग, आकार, चकाकी व टिकवणक्षमता चांगली असणे गरजेचे असते. त्यानुसार स्थानिक बाजारपेठेत मागणी असलेल्या वाणांची लागवड केली जाते.
  •  रोपवाटिकेतून रोपे आणून त्यांची लागवड केली जाते. लागवड नियोजनानुसार खासगी रोपवाटिकेत रोपांची आगाऊ नोंदणी करावी लागते.
  •  लागवडीसाठी एकरी ७ ते ८ हजार रोपे लागली. एक रोप साधारण १ रुपया २० पैसे दराने मिळाले. लागवडीसाठी रोपवाटिकेतून रोगमुक्त व सशक्त रोपे आणली.
  •  चार फुटांच्या बेडवर दोन रोपांत २ फूट अंतर राखत झिगझॅग पद्धतीने लागवड केली. तीन एकर लागवडीसाठी साधारण २१, २२ हजार रोपे लागली.
  •  संपूर्ण लागवड मल्चिंग पेपरवर केलेली आहे.
  •  लागवड १५ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर या दरम्यान मजुरांच्या मदतीने पूर्ण केली.
  •  लागवडीच्या ३५ ते ४५ दिवसांनंतर बांबू, सुतळी व तार वापरून झाडांची बांधणी केली आहे.

खत व्यवस्थापन :

  • माती परीक्षण करून जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांची माहिती घेऊन खतांच्या वापरावर भर दिला जातो.
  • पांढरी मुळी वाढीसाठी ह्युमिक ॲसिड ठिबक सिंचनाद्वारे दिले.
  • फूलधारणा होण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करण्यात आला.
  • एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर असतो. त्यामुळे गरजेनुसार संतुलित प्रमाणात खतांचा वापर केला जातो. माती परीक्षण केल्याने जमिनीला नेमकी गरज कोणत्या अन्नद्रव्याची आहे, हे लक्षात येते.
  • त्यामुळे मर्यादित खर्च करून उत्पादन घेणे त्यांना शक्य होत आहे. संतुलित अन्नद्रव्य झाडास मिळाल्याने झाड सशक्त होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • पिकाच्या वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांमध्ये १३:०:४५, ० :०:५०, ०:४५:३५, १८:०:४६ खते गरजेनुसार वापरल्याने झाडांची वाढ जोमदार होऊन अधिक फळ धारणा झाली आहे.
  • पीक फुलोऱ्यात तसेच फळवाढीच्या अवस्थेत योग्य वापर करणे गरजेचे असते. त्यानुसार ठिबक सिंचन पद्धतीने वाफसा अवस्था पाहून सिंचन केले जाते.

कीड-रोग व्यवस्थापन :

  • ढगाळ वातावरण व थंडीमुळे चालू हंगामात विविध अडचणींचा सामना करावा लागला. पिकावर फुलकिडे, लाल कोळी व फळ पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.
  • कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी, तसेच चिकट सापळ्यांचा वापर केला. पिकाचे वेळोवेळी निरीक्षण करून त्याची नोंद ठेवली होती. काही झाडांवर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आला.
  • प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट केली. पीक संरक्षणावर सर्वाधिक खर्च होतो. त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होते.
  • त्यासाठी लागवडीपासून टोमॅटो काढणीपर्यंत पिकाचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते. जेणेकरून प्रादुर्भाव काही प्रमाणात टाळण्यास मदत होईल. आणि संभाव्य नुकसान कमी होईल.

तोडणी व विक्री :

  • लागवडीनंतर साधारण ८५ दिवसांनी फळांची तोडणी सुरू झाली. पहिला तोडा २७ जानेवारीला केला. त्यातून १२५ ते १५० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले. अनुभवानुसार सुरुवातीचे काही तोडे कमी उत्पादन मिळते. मात्र त्यानंतर प्रत्येक तोड्यास उत्पादनात वाढ होत जाते.
  • आतापर्यंत साधारण ३ तोडे झाले आहेत. त्यापैकी दुसऱ्या तोड्यातून ३०० ते ४०० क्रेट आणि तिसऱ्या तोड्यातून ५०० ते ७०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले आहे.
  • देशातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांसोबत ओळखी झाल्या आहेत. त्यानुसार संपूर्ण मालाची विक्री बाहेरील राज्यात केली जाते. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार दर्जेदार मालाचा पुरवठा केला जातो.
  • त्यामुळे स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत चांगले दर मिळण्यास मदत होते. दरवर्षी गुजरात येथील मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठविले जातात. मात्र यंदा हैदराबाद येथील मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी पाठवत आहे.
  • चालू हंगामात प्रति किलो १५ ते २० रुपये दराने विक्री झाली आहे. हाच दर स्थानिक बाजारात १० रुपयांपेक्षा कमी आहे.
  • आतापर्यंत तीन तोडे झालेले असून अजून किमान ७ ते ८ तोडे होण्याचा अंदाज रोहिदास सांगतात.

रोहिदास जाधव, ९६८९४६५६३१, (शब्दांकन ः मुकुंद पिंगळे)

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top